Tuesday 9 April 2019

थारी बिकट नगरिया...

परवाच्या रविवारी किशोरी आमोणकरांवरच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. बघता-बघता, ऐकता-ऐकता डोक्यात काही विचार आले, काही प्रश्न पडले.

खरंतर आमोणकरांच्या गाण्याबद्दल काही भाष्य करावं, इतकी माझी पात्रताच नाही. ताईंचं (मला खरंतर त्यांना 'ताई' असं संबोधायची सवय नाही, पण आजूबाजूचे बहुतांश लोक तसंच म्हणतात, शिवाय टायपिंगचे कष्टही जरा कमी होतात, म्हणून माझ्यासाठीपण ह्या स्फुटापुरत्यातरी त्या 'ताई'च) गाणं बेहद्द आवडतं; ते ऐकताना हरवून, हरखून जायला होतं; शांत वाटतं; असं म्हणावं नि चूप बसावं, इतकीच खरंतर माझी सांगीतिक लायकी! त्यामुळे हे सर्व लिहावं, की लिहू नये असा संभ्रम होताच.
पण हे काही त्यांच्या सांगीतिक केपेबिलिटीजवरचं भाष्य नाही, त्याबद्दलचं क्रिटीसिज़म नाही, हे सॉर्ट ऑफ़ लाऊड थिंकिंग आहे, त्यामुळे हे उघडपणे लिहिणं हे काही पाप नाही, असं स्वतःला समजावून शेवटी लिहायला घेतलंच.
शिवाय हे स्फुट चुकूनमाकून एखाद्या संगीततज्ञ, विद्वान, जाणकार माणसाच्या हाती पडावं, आणि त्यांनी माझ्या ह्या शंकांचं निरसन करावं, माझे समज-गैरसमज सुधारावे, हाही एक स्वप्नरंजनात्मक विचार होताच लिहिण्यामागे.

ताईंच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल जे उल्लेख त्या मुलाखतींत आले, त्यावरुन हे प्रश्न पडायला सुरुवात झाली खरंतर.

ताई शिकवताना रागाचं नाव सांगत नसत. दॅट्स ऑलराईट! पण आरोह-अवरोहसुद्धा नाही? वादी-संवादी नाही? नुसती वातावरणनिर्मिती केली जाई, आणि शिष्य त्यातून शिकत म्हणे.

वातावरणनिर्मिती वगैरे सगळं ठीकच आहे, बरोबरच आहे, जमलंच पाहिजे, पण ती शेवटची पायरी असणार नाही का? आधी त्या रागाची चौकट आखून नाही द्यायची? व्याकरणाची पायरी पहिली. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे ते व्याकरण सांभाळत तो राग फुलवणं. आणि फुलवताना त्या रागाची वातावरणनिर्मिती करणं त्यानंतरचं पण अत्यंतिक महत्त्वाचं. हे सगळं ह्या किंवा तत्सम क्रमानी गुरूनी शिकवणं अभिप्रेत नाही का?

ताईंच्या सान्निध्यात, त्यांच्यासमोर बसून शिकताना, गाताना, ताईंनी निर्माण केलेलं/शिकवताना निर्माण होत असलेलं, त्या रागाचं वातावरण कदाचित शिष्याला तेव्हा गाईड करेल. एखादा अनाहूत सूर शिष्याला आपसूक जाणवेल. पण त्या समोर नसताना काय? त्यांच्या सूरांचा आधार नसताना काय? शिष्य जेव्हा त्याचात्याचा एकट्याने अभ्यास करेल, तेव्हा रेफ़रन्स पॉईंट्स काय घ्यायचे त्यानी? थेट रागाच्या भावविश्वाचा रेफ़रन्स हा शिष्याला अवघड नाही होत? ही मेथड खरंच वर्क होते का? ताई संगीत कोळून प्यायल्या होत्या, त्यांच्या लेव्हलला डायरेक्ट हा विचार मांडणं सोपं असेल, अनुभवसिद्ध असेल, पण शिकाऊंचं काय? काहीही क्रिप्टीक न बोलता, सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत याची उत्तरं मिळतील?

म्हणजे बघा, डोंगरमाथ्यावरून कसं सुंदर, विहंगम दृष्य दिसतं हे माहित आहे, परंतु तिथे पोहोचायचा रस्ताच माहित नाही, असं नाही का हे?
ज्याला स्वत: वर चढून ते दृष्य पाहायचंय, त्याला रस्ता माहित नसेल तर कॉन्फ़िडन्स कुठून येणार?

हे सगळे प्रश्न, हे ’शास्त्रीय’ संगीत आहे म्हणून.

रघुनंदन पणशीकरांची मैफिल छान होते. ते सोडून असे कोण कोण शिष्य आहेत ताईंचे, जे फ़क्त ताईंकडेच शिकले? (र.प. फक्त ताईंकडेच शिकले ना?) ताईंचं नाव आणखी अनेक वर्ष ’गुरु’ म्हणून लखलखतं ठेवतील असे कोण आहेत? कोण आहेत ज्यांनी एक परफ़ॉर्मर म्हणूनही लौकिकार्थाने यश मिळवलं? माझ्या डोक्यात लौकिकार्थानं यशस्वी अशी जी नावं चटकन येताहेत, ते कोणीच एक्सक्लुसिव्हली ताईंकडे शिकलेले नाहीत. आणि पणशीकर बुवांचा एक अपवाद वगळता, बाकी जी नावं आठवताहेत त्यांचं गाणं माझ्या मनाला काही केल्या रिझवत नाही. काहींचं गाणं रटाळ वाटतं, काहींचं रूक्ष. काहींचा कॉन्फ़िडन्स स्टेजवरच इतका व्हिजीबली लो असतो, की तो श्रोत्यालाही जाणवतो. मधूनच चांगले तुकडे दिसतात, पण एकंदर परफ़ॉरमन्स डागाळतोच. असं का व्हावं? हे शिकवण्याच्या पद्धतीतलं वैगुण्य म्हणायचं का?

आणि डायरेक्ट भावविश्व मेथड त्या सुरुवातीपासूनच वापरत होत्या का? की त्यांचे विचार, त्यांचं गाणं जसजसं बदलत गेलं, तसतशी शिकवण्याची पद्धतही बदलली? ताईंकडे पूर्वी शिकत असलेल्या शिष्यांपैकी कोणी यावर प्रकाश टाकला, तर किती बरं होईल! त्यांचा जुना शिष्यवर्ग ऑडियन्ससाठी तर गायबच आहे. शिकणार्‍या, शिकवणार्‍या लोकांच्या सर्कलमध्ये कदाचित वावर असेल अजूनही, पण सामान्य श्रोत्यासाठी पूरानी यादे!

ज्या ताईंनी संगीतात इतकी उंची गाठली, सूरांच्या जोरावर वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य केलं, त्यांच्या कोणत्या शिष्यांत त्यांचे नक्की कोणकोणते गुण उतरलेत?

ताई एक फ़ेनॉमेना होत्या. तसं काही पुन्हा होणं निव्वळ अशक्य आहे. तरीदेखील, शिष्यगणांपैकी कोणाची मैफ़िल असल्याचं कळलं, की मनाला तरतरी येते. त्यांच्या गाण्यातून ताईंची झलक दिसेल अशी भाबडी आशा बाळगून त्या दिवसा-वेळेची आतूरतेने वाट पाहिली जाते. कधी घोर निराशा होते, कधी कमी होते, क्वचित होत नाही.

आणि तरीही... पुन्हा कधी जाहिरात पाहिली की डोळे चमकतात, तिकीटं काढली जातात, आणि आपण अगदीच निबर, निराशावादी झालेलो नाही, हे जाणवून मनाला उगाचच तसल्ली मिळते.

- प्रथमेश नामजोशी

Saturday 14 April 2012

म्हारो प्रणाम...

मेघनाने हा खो दिल्यावर कोणाबद्दल लिहू हा प्रश्न खरं तर पडलाच नाही. पण काय काय लिहू आणि कसं लिहू हे मात्र अद्याप आहेत. कारण आपल्याला भयानक आवडणार्‍या कुठल्याही गोष्टीबद्दल समोरच्याला सांगताना शक्यतो संयतपणे सांगावं, नाहीतर समोरच्याला तो अतिरेक वाटून तो आपल्याला तरी कंटाळतो किंवा आपण ज्या गोष्टीबद्दल सांगतोय त्याबद्दल तरी अनास्था निर्माण होऊ शकते. आणि माझा पूर्वानुभव असं सांगतो की, मी 'किशोरी आमोणकर' या व्यक्तीबद्दल बोलताना बेभान होतो. मला फार उशिरा कळतं, की प्रथमेश बास! समोरच्याचा विचार कर...

किशोरी आमोणकर. या बाईंबद्दल खरंच काय बोलू? हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातला एक चमत्कार म्हणू? की 'चित्रपटसृष्टीला पडलेलं सुरेल/चिरतरुण/सुंदर स्वप्न' या चालीवर काही म्हणू?

खरं तर त्यांच्या गाण्याविषयी काही बोलावं, म्हणावं इतकीही माझी औकात नाही याची पूर्ण जाणीव आहे मला. पण तरीही काहीतरी म्हणायचा मोह आवरत नाहीये...

मला त्या नेहमी एखाद्या बेटासारख्या वाटतात. संगीताच्या महासागरात तेजस्वीपणे उभं असलेलं बेट. ज्याला त्या बेटावरच्या सुरांची जादू कळल्ये, त्याला त्या बेटाच्या आजूबाजूला घुटमळण्याचं अनिवार आकर्षण वाटणारच. त्या महासागरातल्या सगळ्या उलथापालथींनी, त्यातल्या सगळ्या वार्‍यावादळांनी, लाटांचे तडाखे बसावेत तशा उठलेल्या टीकेच्या झोडीनं, कशानंही लोपून, दबून जाता, आपल्या स्वरसामर्थ्यानं सगळ्याला टक्कर देत उभं असलेलं बेट. त्या बेटावर यायला सरसकट कोणालाही परवानगी नसावी. काही पुण्यवान माणसांनाच तो योग लाभलेला. आणि ज्यांना तो योग लाभलाय त्या समस्त मंडळींवर जळणारे माझ्यासारखे लोक अल्पसंख्याक नसावेत.

मला त्यांचं पहिलं जे गाणं 'क्लिक' झालं, ते होतं मीरेचं 'म्हारो प्रणाम' हे भजन.
त्यातल्या 'बाके बिहारी जी'मधले 'के', 'हारी', 'जी' हे तुकडे; नंतरचं 'रिझरिझावा' सगळंच मोहून गेलं. प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ घेताना ती जरा हलकी खेचून गायल्ये असं वाटलं. मशीनमधून भरभर वेटोळत बाहेर येत असलेलं सॉफ्टी आईसक्रीम एकदम स्लो-मोशनमधे करून बघताना कसं वाटेल तसं काहीसं. त्याची पारायणं केली. मग अजून नवीन काही ऐकायची तहान लागली. तेव्हा त्यांच्या गायकीनं डोक्यातली जी जागा व्यापली ती कधी सोडलीच नाही. त्यांना जितकं अधिक ऐकलं तितकी ती जागा अधिक पक्की होत गेली. मग तोडीमधलं 'बेगुन गुन गाइ', नंतरचा 'ताना नादीर दीम दीम' हा तराणा; अहिरभैरवातलं 'सखिया म्हारा' आणि 'नैनवा बरसे'; यमनातलं 'एरि आली पियाबिन'; भैरवीतलं 'अब रतीया किधर गवाइ', 'कोयलिया ना बोल डार' ही ठुमरी, पं.चौरसियांबरोबरची 'बाबुल मोरा' ही जुगलबंदी आणि त्यांचा 'भूप'...
कलत चाललेला दिवस, साडेपाच-पावणे सहाचं थोडं पिवळसर ऊन, अशा शांत संध्याकाळी हत्तीवर अंबारीत बसून गावात रपेट मारणारा राजा. पण आनंदी शांतता नाही, थोडी खिन्न शांतता... हे चित्र उभ राहातं त्यांचं 'एरि आज भईलवा'मधला जीवघेणा 'भईलवा' ऐकताना आणि नंतरचं 'सहेला'ला केलेलं आर्जव ऐकताना...
आणि अजून काय काय...
सगळंच वेड लावणारं. हे फक्त उथळ उल्लेख. स्वतःचे राग-लोभ विसरून, तुम्ही जो राग ऐकताय तोच तुम्ही होता. ही अवस्था अजून कोणाला ऐकताना कधी होईल का? नाहीच कदाचित...
आणि आता मी ती डोक्यातली जागा कायमस्वरूपी बाईंच्या नावावर केल्ये. अतिरेक वाटतोय? हरकत नाही... हक़ीक़त आहे. मला त्या 'चढल्या' आहेत.

आपण फक्त एवढंच नोटीस केलं की, 'आज माझा सूर लागत नाही' असं म्हणत गाताच बाई प्रेक्षकांची माफी मागून निघून गेल्या. किंवा ग्रीन्ररूममधून बाहेर येऊन स्टेजवर जाताना कोणी मधे आलं तर बाई चिडतात. किंवा त्या साथीला बसलेल्यांचा भर मैफिलीत अपमान करतात. साउंड सिस्टमवाले म्हणजे तर त्यांचं हक्काचं गिर्‍हाईक इत्यादी. अशा त्यांच्याबद्दलच्या अनेक वदंता ऐकत असताना हळूहळू कळायला लागलं की, त्यांच्या त्या वागण्यामागे काही ठोस विचार आहे आणि क्वचितप्रसंगी त्यांच्या काही मर्यादाही. त्यांच्यावर गुरूकडून झालेले संस्कार, गुरूची शिकवण यांच्याबरोबरच स्वत:ची उपजत बुद्धी, स्वराची साधना, अभ्यास ह्या सगळ्यातून तयार झालेलं ते अलौकिक रसायन आहे.

बंदिशीतल्या शब्दांना अनुरूप असा भाव गाण्यात उतरवण्यार्‍या (शास्त्रीय संगीतामधे शब्दाला, शब्दार्थाला दुय्यम महत्त्व या पारंपरिक समजाला छेद देत), रागाच्या सादरीकरणाचा प्रस्थापित साचा मोडण्यार्‍या (त्याला प्राचीन स्वरशास्त्राचं अनुष्ठान देत), आलाप-ताना करताना सरगम घेऊन किंवा मंद्र आणि तार सप्तकातल्या टोकांना उगाच आवाज नेत आपली माध्यमावरची हुकूमत दाखवली की टाळ्या मिळतात, हे जाणूनसुद्धा त्या प्रकारापासून लांब राहणार्‍या, गाणं सुरू करण्यापूर्वी आणि मैफल संपल्यावर गुडघ्यावर बसून श्रोत्यांच्यासमोर डोकं टेकवून त्यांचे आशीर्वाद घेणार्‍या, श्रोत्याच्या मनोरंजनापेक्षा त्याच्या आतल्या 'मी'चं आणि राग-भावाचं अद्वैत कसं होईल याचा विचार करणार्‍या, घराणेशाहीची झापडं काढून एकसंध, सलग संगीतविश्वाचा आग्रह धरणार्‍या , सुरुवातीला बर्‍यापैकी ओपन थ्रोटेड वाटणारं त्यांचं गाणं परिपक्व होत जाताना आता एकदम सबड्यू होऊन गाणार्‍या, "मला जे म्हणायचंय ते अस्थायीमधेच म्हणून झालेलं असताना, माझ्याकडे नवीन काही मांडायला उरलेलं नसताना, मी केवळ फॉरमॅट फॉलो करायला म्हणून अंतरा गायचा का? हा विचार करणार्‍या , 'वयोमानाप्रमाणे आवाजाला कंप येतो' या कल्पनेतून आलेली भीती इतकी वर्षं मी ज्या सुरांची सेवा केली, ज्यांचे पाय घट्ट पकडून ठेवले, तेच सूर आता मलाच सोडून नाही ना जाणार?" असं म्हणून व्यक्त करणार्‍या, गायकामधला 'मी' जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत सच्च्या सुराला शरण जाता येत नाही असं मानणार्‍या आणि हे आपल्या शिष्यांमधे हे उतरवण्यासाठी कठोर शिस्त पाळणार्‍या आणि पाळायला लावणार्‍या , पण त्यांच्यावर आईसारखं प्रेमही करणार्‍या... आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रात इतकं अढळ स्थान मिळूनही; चॅलेंजेस, स्पर्धा, टीका या सगळ्यापलीकडे पोहोचूनही; बनचुकेपणाचा लवलेशही येऊ देता अजूनही एका विद्यार्थाच्या वृत्तीने गाण्याकडे बघणार्‍या अशा बाई...

देवानं आपल्यावर फार मेहेरबान होऊन यांना पाठवलंय आणि मला खात्री आहे की त्यांनी हा 'किशोरी आमोणकर' नावाचा साचा त्यांना बनवून लगेच मोडून टाकला असणार. कारण अर्थातच असे चमत्कार वारंवार करण्याइतका तो दयाळू वगैरे नाही. पण आमचे कालखंड थोडे का होईना ओव्हरलॅप झालेत आणि मला त्यांना प्रत्यक्ष ऐकण्या-पाहाण्याचं भाग्य लाभलंय यासाठी मी त्याचा ऋणी आहे. नतमस्तक व्हावंसं वाटताना देव्हार्‍यातल्या देवाच्या आधी जी आठवते, जिला वारंवार ऐकणं हे जप-जाप्याइतकंच पवित्र वाटतं, अशा या गानसरस्वतीचे आम्ही भक्त आहो हेही आमचं सौभाग्यच नाही का?

Sunday 4 March 2012

वळीव

    काही गोष्टी लिहायला म्हणून बसलं, की लक्षात यायला लागतं की ह्या जशा वाटल्या होत्या त्याहून वेगळ्याच आहेत. वाटल्या तेवढ्या कठीण नाहीयेत किंवा वाटल्या होत्या तेवढ्या सोप्याही नाहियेत. किंवा अजून काही, अनडिफायनेबल...

    आपल्या दोघांचं नातं हे सर्वार्थानी तिसर्‍याच कॅटेगरीमध्ये मोडणारं.. huh.. रादर मोडलेलं. एका डेफिनिशनमध्ये मांडता न येणारं.

    कोण होतो आपण एकमेकांचे? नातं नाही ठरवता येणार. पण बरंच काही होतो एकमेकांसाठी. स्वच्छंद धमाल करताना जिवाभावाचे मित्र-मैत्रीण, भावंडांसारखा एकमेकांना आधार देणारे, वडीलधार्‍यासारखे अधिकाराने ओरडणारे, समजावणारे, कधी नर-मादी. कळत-नकळत, आपल्या सोयीनुसार आपण आपल्या नात्याचं लेबल बदलत गेलो. रादर आपण नाहीच बदललं काही. ठरवून होणारी गोष्ट नाहीच ती. ते आपोआपच बदलतं. आपण फक्त बिनमहत्त्वाच्या, बिनगरजेच्या वाटलेल्या गोष्टींना बाजूला सारत पुढे जात राहिलो. अनोळखी प्रदेशातल्या नव्या जागा, नव्या वाटा पालथ्या घालत राहिलो. आधी थोड्या बिचकत, मग सरावाच्या झाल्यासारखे. बिनधास्तपणे. धुंदीतच एका. काही एक्स्प्रेस करून, नीट ठरवून, जरा पुढच्या वाटांचा अंदाज घेत पुढे जावं, याचं भान ठेवायचं राहूनच गेलं.

     सुरुवातीला एकमेकांची दखलही न घेणारे आपण. नंतर बाकीच्यांची दखल न घेता मोकाट सुटलेले आपण आणि आता एकमेकांना एकमेकांच्या आयुष्यातून बेदखल करायला निघालेले आपण. केवढा लांबचा पल्ला गाठला आपण! पूर्णच केलं की एक वर्तुळ.

    कसे होतो ना आपण... मॅड एकदम. क्षुल्लक निमित्त शोधून काढायचो भेटण्यासाठी. आईसक्रीम उकळायचो एकमेकांकडून. कधी नवीन चष्म्याची ट्रीट, कधी लेन्सेस करायला टाकल्याची ट्रीट, कधी विमानात फेव्हरेट हिरो बाजूला बसला होता म्हणून, कधी ऑफीसमधे कोणाला तरी उद्धटपणे फाट्यावर मारायला जमलं म्हणून, फेसबुकवर शंभराहून अधिक लाइक्स मिळाले म्हणून, कधी एकमेकांना एकमेकांच्या भाषांमधून दोन वाक्य अस्खलित बोलता आली म्हणून. ज्या वर्षीच्या वाढदिवसांना आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, त्या वर्षीच्यासुद्धा पार्ट्या घ्यायचो.. बालिश, वेडी निमित्तं.

    स्कूटरवर मागे बसायलापण किती घाबरायचीस. केवढे ते नखरे बसेस्तोवर... शेवटी "ये मग एकटी चालत, नाहीतर रिक्षेनी," असं म्हणून स्कूटर जरा पुढे नेल्यावर तुझं खास मिश्कील, वेडावून दाखवल्यासारखं हसणं फेकत बसायचीस येऊन. हा सीन नेहमीचाच. नेम केल्यासारखा. फक्त एकदा मोडला. तू सरप्रायझिंगली काहीही काचकूच न करता सहजपणे बसलीस. आपण शेवटचे भेटलेलो तेव्हाच. मी बस म्हटल्यावर लगेच बसलीस, तेव्हा मी मागे वळून "ऑ" असं केल्याचंपण आठवतंय.  आणि टू-व्हीलरची इतकी भीती असूनसुद्धा तू एकदा स्कूटर शिकायला तयार झालीस चक्क. ती एका साबणाची जाहिरात होती ना! तो तिला मागे बसून बाइक शिकवत असतो, तसंच. आवडायलाच लागली तेव्हापासून ती जाहिरात. ते आठवलं, की कितीही भिकार मूड असला ना, तरीही बारीकसं हसू येतंच चेहर्‍यावर.

    तुझं ते पर्फ्यूम! तुझं आणि त्या गोड वासाचं समीकरणच बसलंय डोक्यात फिट्ट. दुसर्‍या कोणावर सहनच नाही होऊ शकत तो वास. तुला नेहमी येणारा तो दरवळ. त्याच्याशिवाय तू अपुरीच आणि दुसरीकडे भेटला कधी तर तुझ्याशिवाय तोही अपुराच. एकदा मरीन ड्राईव्हला चालत होतो आणि बाजूने तसाच वास पास झाला. सर्रकन वळलो.  तूच आहेस की काय? नाही, ती तू नव्हतीस. पण हे कळेपर्यंतच्या दोन क्षणात आश्चर्य, आनंद, एक्साइटमेंट वगैरे उतूच गेलं फटकन.  तेव्हा लक्षात आलं, की ’अरे, हे पर्फ्यूम तर हजा़रोजणी वापरत असतील. वेडा!’ एकदा नाटकाला बसलो होतो तेव्हापण येत होता तसला वास. मराठी नाटकाला तू येणं अशक्य, (आली असतीस तर माझ्याचबरोबर, अन्यथा नाहीच), हे माहीत असूनदेखील नाही राहवलं आजूबाजूला-मागे नजर टाकल्याशिवाय. परवा एका दुकानात पर्फ्यूम घ्यायला गेलेलो. भेट म्हणून द्यायचं होतं एका बहिणीला. कसंतरीच झालं एकदम, जेव्हा दुकानदारनी नेमकं तेच धरलं नाकासमोर. दुसर्‍या बाटल्या बघतानापण मधूनमधून तीच निळी बाटली हातात घेऊन हुंगत होतो मी. बोटावर फवारून ठेवलं. पण तुझा वास दुसर्‍या कोणाला भेट म्हणून द्यायचं धाडस नाही झालं मला. वेळेबरोबर उडत जाणारा तुझा वास माझ्यात भरून ठेवण्याची केविलवाणी धडपड नंतर नाक आणि हात बराच वेळ करत होते.

   आणि तुझे डोळे! ओह, फ्रीक! परफेक्टली काळेभोर, टप्पोरे. हसणारे, चिडवणारे. चमकणारे. तू दुसर्‍या रंगाच्या लेन्सेस घ्यायच्या म्हटल्यावर केवढा इरिटेट झालेलो मी. गॉड्स गिफ्ट कळत नाही का, हे - ते, काय काय बोललो होतो. आणि "हेच ऐकायचं होतं" असे हावभाव चेहर्‍यावर आणून गंमत बघणारी तू. जसे काही तुझे डोळे हा माझा वीक पॉइंटच झालेला. आणि हे कळल्यासारखं, मला डिवचायला मुद्दाम हा विषय काढायचीस नंतर कधीतरी...

   भांडणं तर अगणित झाली ना आपली. आणि तूच सॉरी म्हणायचीस बहुदा. अबोला संपवायचीस. पडतं वगैरे घेऊन सॉरी म्हणायला मला जमायचंच नाही कधी. अगदी क्वचित. एखाद्-दुसर्‍यांदा. लाडावून ठेवलेल्या त्या इगोनी, कधी चार पावलं पुढे जाऊन नमतं घेण्याचा समजूतदारपणा दाखवूच दिला नाही मला. आणि नाही दाखवला थोडा समजूतदारपणा कधी काळी, फक्त आपलीच व्याख्या प्रमाण मानून चाललं, की खटके उडायला, समोरच्यापासून तुटायला वेळ नाहीच लागत. आपण असेच एकमेकांच्या व्याख्यांना आणि पर्यायानी स्वाभिमानाला सतत आव्हान देत राहिलो. आणि नंतर नंतर "तुझ्या मते तसं असेल.. पण मला तसं वाटत नाही.." हे सरतेशेवटी येणारं वाक्यं सुरुवातीलाच यायला लागलं. म्हणजे आपण एकमेकांच्या मतांचा आदर करून त्यांचं असणं स्वीकारत होतो असं नव्हे, तर "मला तुझ्याशी तेच तेच वांझोटे, निरर्थक वाद घालण्याची इच्छा नाही" असं. एखादाच मोठा धोका, फसवणूक, विश्वासघात असं काहीच सरळसरळ पॉइंट आउट करण्यासारखं झालंच नाही कधी आपल्यात. वापरता वापरता कापड विरत, विटत जातं तसं झालं आपलं. हळूहळू.

   आणि बाय द वे, तुझ्या एक गंमत लक्षात आल्ये का? तू चालल्येस गं निघून, पण मी होतो तिथेच असणारेय. तू जाशील तुझ्या होमटाऊनला आणि सहज फिरू शकशील गावभर. पहिल्यासारखी. पण जिथे "तू" अधिक "मी" बरोबर "आपण" झालो, त्या इथल्या जागा मला मात्र छळत राहतील आता आयुष्यभर. भकास, रिकाम्या होऊन. पण तिथे गेल्यावर आपल्या दोघांना त्या ठिकाणी इमॅजिन करण्याचा खेळ मी टाळीन बरं का निग्रहाने!

  पण जाता जाता माझी ही एक विनंती आहे. हे असं सारखं मागे वळून बघणं बंद कर प्लीज़.

"जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा

कुरेदते हो जो, अब राख जुस्तजू क्या है?"

गालिब सगळंच म्हणून बसलाय. आपण त्याच्याच ओळी वापरून तेच पुन्हा म्हणायचं. मनाला शब्दबद्ध करताना, मोकळं करताना, गालिबची निर्मिती उसनी घेण्याची अपरिहार्यता कशी टाळणार?

तर हे मागे वळून पाहणं थांबव. माझ्या बुद्धीचं मनाला समजावण्याचं काम जवळ जवळ पूर्ण होत आलंय. मी समजावलंय मनाला, की हा खेळ आता संपला आहे. पुन्हा चालू न होण्यासाठी. नव्याने डाव मांडायची ऊर्जा नाही आता. आपणही आवरतं घेऊन पुढची वाट चालायला हवी वगैरे.

आणि तेव्हाच जर आपल्या खेळगड्यानी पुन्हा मागे फिरून बघितलं, तर तेव्हा बुद्धीनी घेतलेली सगळी मेहनत पाण्यात जायला लागते. बुद्धीला कळत असतं, की हा अवेळी पडणारा पाऊस आहे. नंतर अजून भयंकर उकाडा वाढवणारा. फक्त तात्पुरती वातावरण-निर्मिती करणारा. पण तो क्षणाचा मृद्गंधपण मनाला परत मोर व्हायला निमित्त ठरतोच. पुन्हा पिसारा फुलवायचा आणि पुन्हा उघडं पडायचं. तेव्हा बुद्धीला येतो, तो हताशपणा. का सोडलं, मनाला इतकं मोकळं? का नाही केला त्याचा दगड? कीव येते स्वतःचीच.

आता खर्‍याखुर्‍या पावसाची पण भीतीच... कळायचं तरी कसं, कोणता खरा, कोणता तात्पुरता? 

"तू परत माझा मोर करू शकत नाहीस" ही समजूतच माझ्या इगोला सुख देतेय. राहू दे ना ती अबाधित. मनाला काय जातंय उगाच झुरायला वगैरे. भरल्या पोटचे धंदे सगळे. दोन वेळचं अन्न, कपडा-लत्ता, डोक्यावर सुरक्षित छप्पर हे आणि बाकीचं सगळं मूलभूत आपसूक, सुखासुखी मिळालंय, मिळतंय, त्याचाच माज म्हणून आलेली बायप्रॉडक्ट्स आहेत ही सो़कॉल्ड दु:ख-बि:ख, असं मी स्वत:ला नीट समजावलंय आता. आता भ्रम नकोत मोडायला...

आता काहीही कर तू. माझ्याभोवती एक आवरण तयार झालंय. झालंय म्हणजे मीच केलंय ते. त्यामुळे आता तू माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीस. शब्दानी नाही, गंधानीही नाही, स्पर्शानीही नाही आणि नुसत्या आठवणीनीही वेड लावणार्‍या तुझ्या त्या काळ्याभोर डोळ्यांच्या नजरेनेही नाहीच...

नाही ना?

- ३ मार्च, २०१२